पुढारी ऑनलाईन: मुंबईत काल (दि.०१) मविआची वज्रमूठ सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी बारसू प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, 'जे आता हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं, हे आश्चर्यच आहे'. अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते गडचिरोली येथून माध्यमांशी संवाद साधत होते.
गडचिरोलीला अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे खरीब पिकांचा आढावा बैठक घेण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस सोमवारपासून गडचिरोलीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कालची मविआची सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम होता. सभेच्या माध्यमातून बारसूमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना केवळ टिका करायची आहे.
ठाकरेंना किती गांभीर्याने घ्यायचे हे जनतेने ठरवले पाहिजे. हे तर माझ्यासाठी केवळ मनोरंजन आहे. अनेक लोकांचा बारसू रिफायनरीला पाठिंबा आहे. परंतु, बारसू प्रकरणी विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. येथील लोकांना भडकवून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे; असे देखील त्यांनी म्हटले आहे.