पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने न्युझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत दमदार सुरूवात केली. मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून शुभमन गिलने द्विशतकही ठोकले. (IND VS NZ)
मात्र, न्युझीलंडविरुद्धच्या या सामन्य़ात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून मोठी चूक झाली आहे. यामध्ये भारतीय गोलंदाजांनी संथ गतीने गोलंदाजी केली. भारतीय संघाने निर्धारीत वेळेत तीन षटक कमी टाकले होते. या कारणामुळेच या सामन्यात आयसीसीकडून भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. (IND VS NZ)
संथ गतीने गोलंदाजी करण्याच्या नियमानुसार, भारतीय संघाला मॅच फिसच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचार संहितेतील २.२२ नियमानुसार संघातील खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी दंड भरावा लागणार आहे. सामना अधिकारी जवागल श्रीनाथ म्हणाले, भारतीय संघाने निर्धारीत वेळेत तीन षटक कमी टाकले. त्यामुळे हा दंड ६० टक्के इतका असणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपली चूक स्वीकारली आहे. त्यामुळे याबाबत कोणतीही सुनावणी होणार नाही. (IND VS NZ)