पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwin One Handed Six : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने संघर्षपूर्ण विजय मिळवला. यासह भारताने मालिका 2-0 ने खिशात टाकली. दुसरा कसोटी सामना खूपच रोमांचक झाला. एकवेळ असे वाटत होते की भारताला वाईटरित्या पराभवाला सामोरे जावे लागेल, पण श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू रविचंद्रन अश्विन हे संघासाठी तारणहार बनले. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करून बांगला देशच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. या विजयात आर अश्विनच्या दमदार षटकाराचाही महत्त्वाचा वाटा होता ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला.
भारताला विजयासाठी 15 धावा हव्या होत्या, तेव्हा त्यांचा बांगलादेशी गोलंदाज मेहंदी हसन मिराज गोलंदाजी करत होता. त्याचवेळी आर अश्विन लवकरात लवकर सामना संपवण्याच्या मूडमध्ये दिसला. मिराजच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने आधी किंचित वाकून पण नंतर बॅट हवेत उंचावून एका हाताने चेंडू फटकावला जो सीमापार जऊन प्रेक्षक गॅलरीत पडला. अश्विनचा हा 'एकहाती' फटका पाहून भलेभले स्तब्ध राहिले. यावेळी ऋषभ पंतचीही आठवण झाली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा पहिल्या डावात 227 धावा झाल्या होत्या. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला आणि 314 धावांवर सर्वबाद झाला. यासह संघाने 82 धावांची आघाडी घेतली. यानंतर बांगलादेशचा संघ 271 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले. जे भारतीय संघाने 7 विकेट्स गमावून पूर्ण केले.
145 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय डाव गडगडला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस संघाने कर्णधार केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट्स गमावल्या. त्याचवेळी चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच उनाडकट, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या विकेट्सही संघाने गमावल्या आणि संघ अडचणीत आला.
एकीकडे भारतीय संघ संकटात सापडला होता आणि बांगलादेशचा उत्साह उंचावला होता, अशा वेळी संघाचा तगडा फलंदाज श्रेयस अय्यरने हुशार खेळी केली. बांगला देशच्या खेळाडूंवरही त्याने वेळोवेळी हल्ले केले. रविचंद्रन अश्विननेही त्याला महत्त्वाच्या वेळी साथ देत संघाला विजयाच्या दिशेने नेले. (ashwin one handed six)