Latest

पत्नीच्या तेराव्याला पतीचा मृत्यू, जळगावातील घटनेनं हळहळ

गणेश सोनवणे

जळगाव : एका वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने जळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगावच्या मेहरुन परिसरात पत्नीचा तेराव्याच्या कार्यक्रमानंतर पतीचेही निधन झाले आहे. मात्र वडिलांनी जाता जाता आम्हाला मोलाचा संदेश दिल्याचे मुलांनी सांगितले आहे. पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर पतीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर पतीनेही प्राण सोडला आहे.

शकुंतलाबाई श्रीराम बोडखे (वय ७५ वर्ष) यांचं दोन आठवड्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या तेराव्याच्या दिवशी ७८ वर्षीय पती श्रीराम भिमराव बोडखे यांनीही अखेरचा श्वास घेतला. जळगाव मेहरूण परिसरातील भवानी नगर येथील वाय. डी. पाटील शाळेसमोर राहणाऱ्या शकुंतलाबाई श्रीराम बोडखे यांचे ८ जानेवारी रोजी निधन झाले. रात्री अकरा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या गंधमुक्ती व तेरावीचा कार्यक्रम शुक्रवार २० जानेवारी रोजी पार पडला.

मुलांना दिला अखेरचा संदेश...
हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शकुंतलाबाई यांचे पती श्रीराम भिमराव बोडखे (वय ७८ वर्ष) यांनी देखील जीव सोडला. पत्नी शंकुतलाबाई यांचा विरह त्यांचा सहन झाला नाही, यातून शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास श्रीराम बोडखे यांची प्राणज्योत मालवली. सकाळपासूनच त्यांची तब्येत थोडी खराब होती. सर्वांशी चांगले रहा, सचोटीने राहा, असे ते घरातील सर्वांना सांगत होते असे मुलगा ताराचंद बारी व अनिल बारी यांनी सांगितले. मयत श्रीराम बोडखे यांच्या पश्चात ताराचंद बारी, अनिल बारी असे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ताराचंद बारी हा रिक्षा चालक आहे तर अनिल बारी हे कंपनीत नोकरीला आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT