पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये विकास केला आहे. इटालियन चष्मा काढला तर राहुल गांधींना अरुणाचल प्रदेशमध्ये झालेला विकास दिसेल, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला. अमित शहा यांच्या हस्ते अरुणाचल प्रदेशमधील नामसाई जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी ते बाेलत हाेते.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. तेथे एका मुलाखती दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जाेरदार टीका केली. याचा समाचार घेताना शहा म्हणाले की," काँग्रेस नेते विचारतात की, मोदी सरकारने आठ वर्षांत काय केले? हे लोक डोळे बंद बसलेले आत्ता जागे होत आहेत. राहुल गांधी यांनी आपला इटालियन चष्मा काढावा आणि पंतप्रधान मोदींनी केलेला विकास पहावा."
गृहमंत्री अमित शहांनी अरुणाचल प्रदेशच्या नामसाई जिल्ह्यात गोल्डन पैगोडा येथे भेट दिली. यानंतर ते नामसाई जिल्ह्यातील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत.