पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.३०) राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदें यांच्या गटात असलेल्या आमदार बच्चू कडूंना रस्ते घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चिट मिळाली.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलली होती. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप केला होता. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर 1 कोटी 95 लाखांचा निधी खर्च करत, अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.
जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण करत, एक कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचे समोर आले होते. यानंतर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहारण केल्याचे गंभीर आरोप वंचितने केले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना स्थगिती दिली होती.