पुढारी ऑनलाईन डेस्क : मुसळधार पावसाने रविवारी रात्री तामिळनाडूतील अनेक भागाला झोडपले. राज्य सरकारने शाळांना सुटी जाहीर केली आहे. अनेक ट्रॅक बुडाल्याने राज्यातील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी रात्री उशिरा दक्षिण तामिळनाडूमध्ये सुरु झालेला मुसळधार पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत सुरुच राहिला. कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूरमध्ये सोमवारी पहाटे दीड वाजेपर्यंत तब्बल ६०६ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारपासून (16 डिसेंबर) दक्षिण तामिळनाडूच्या बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे.
राज्य सरकारने पावसाचा फटका बसलेल्या चार जिल्ह्यांमध्ये मदत कार्याला वेग देण्यासाठी चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अन्य चार अधिकाऱ्यांचीही संबंधित कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. कन्याकुमारी आणि तिरुनेलवेली येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पेचीपराई, पेरुंजानी आणि पापनासम धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असून बाधित जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक लोकांना सतर्कतेचे संदेश (एसएमएस) पाठवण्यात आले आहेत.
( Heavy rain lashes Tamil Nadu )
राज्यातील मुसळधार पावसामुळे ट्रॅक आणि रेल्वे यार्डांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अर्धवट रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितले की, कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूतुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये 250 राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा :