संयुक्त राष्ट्र संघाची अवस्था ओसाड गावच्या पाटीलकीसारखी : परराष्ट्रमंत्री जयशंकर | पुढारी

संयुक्त राष्ट्र संघाची अवस्था ओसाड गावच्या पाटीलकीसारखी : परराष्ट्रमंत्री जयशंकर

बंगळूर; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्र संघाची अवस्था दिवसेंदिवस ओसाड गावच्या पाटीलकीसारखी बनली असल्याची जहरी टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी केली. राष्ट्र संघातील सुरक्षा परिषदेची त्यांनी ओल्ड क्लब, अशा शब्दांत खिल्ली उडविली. स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात त बोलत होते.

दिवसेंदिवस राष्ट्र संघाचा प्रभाव कमी होत चालला आहे. ही संघटना निव्वळ औपचारिक बनल्याचे प्रकर्षाने वाटू लागले आहे. सुरक्षा परिषदेची अवस्था तर ओल्ड क्लबसारखी बनली आहे. त्याच्या सदस्यांना कोणत्याही परिस्थितीत परिषदेवरील आपली पकड ढिली होऊ द्यायची नाही. यासाठीच त्यांना परिषदेत कोणताही नवा सदस्य आलेला नको आहे. आपण सर्वेसर्वा असून कोणीही आपल्याला प्रश्न विचारता कामा नये, अशी परिषदेतील सदस्यांची मानसिकता बनली आहे. वास्तविक, देशादेशांतील तंटे मिटवणे, आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी प्रयत्न करणे, जागतिक शांतिदूत म्हणून प्रभावीरीत्या भूमिका बजावणे यासारख्या उदात्त हेतूंनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. आज ही संघटना पूर्णपणे भरकटल्याचे दिसून येते. वैश्विक पातळीवर संघटनेचा कसलाच दरारा, वचक उरलेला नाही, असे निरीक्षण जयशंकर यांनी नोंदविले.

आसनाला चिकटून बसलेले प्रवासी

सुरक्षा परिषदेतील पाच देशांच्या अरेरावीवर भाष्य करताना त्यांनी बस प्रवाशाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, काही प्रवासी अडेलतट्टू असतात. एखादा वृद्ध बसमध्ये दीर्घकाल उभा असतो. एखादी महिला प्रवासी आपल्या बाळाला सोबत घेऊन उभ्याने प्रवास करत असते. मात्र, आसनाला घट्ट चिकटून बसलेल्या आणि धडधाकट असलेल्या प्रवाशाला दया येत नाही. जणू आपण त्या गावचेच नाही, असे त्याचे वर्तन असते. सुरक्षा परिषदेतील देशांचे वर्तन दीर्घकाळापासून नेमके असेच होत असल्याचे दिसून येते.

Back to top button