पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपची राजनीती दहशत निर्माण करणारी आहे. विरोधक संपले पाहिजेत, यासाठी राजकारण करत आहेत. पण लोकशाहीच्या मार्गाने लोक भाजपला धडा शिकवतील. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलावे आणि ईडीने कारवाई करावी यावरून तपास यंत्रणांचा दुरूपयोग सुरू आहे हे सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी छाप्यावर दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने आज छापे टाकले आहेत. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर निशाणा साधला. भाजपचे नेते कोणावर कारवाई होणार हे सांगण्या एवढी तपास यंत्रणा सोपी नाही. केंद्रीय तपास यंत्रणेची एक प्रोसेस आहे. पण भाजपच्या तोतड्यांनी काहीही बोलावे आणि ईडीने कारवाई करावी यावरून तपास यंत्रणांचा दुरूपयोग होत असल्याचे सिद्ध होते, असे पटोले यांनी म्हटले आहे.