Latest

Pune : काढणीस आलेल्या भात पिकाला अवकाळीचा फटका

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भात काढणीची लगबग सुरू असताना रविवारी (दि. 26) अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका भात पिकांच्या तुरंब्यावर झाला असून, खचरातून भात पिकाची गळती झाली आहे. तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून काढणीस आलेली हळव्या जातीच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर गरव्या भात पिकांची लोळवण झाली असून, तुरंब्याच्या भाताची मोठी गळती झाली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेली भात पिके, मळणीसाठी जमून ठेवलेली भात पिके, तर काही ठिकाणी भाताचे पेंढे भिजल्या.

तालुक्याच्या दक्षिण भागातील वरवडी खुर्द, वरवडी डायमंड, वरवडी बुद्रुक, अंबाडे, बालवडी, पाले, पळसोशी, बाजारवाडी, धावडी, खानापूर, हातनोशी, गोकवडी, नेरे, भोर या भागांत मोठे नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगामातील पेरणीला फायद्याचा ठरला आहे.
शनिवारी रात्रीनंतर अवकाळी पावसाने दिशा बदलल्यामुळे अंबवडे खोर्‍यातील पिसावरे, वाठार, नांदगाव आपटी,रावडी, टिटेघर, कोरले, रायरी,वडतुंबी, कर्णवड, या भागातील भात पिकांनादेखील अवकाळी पावसाचा फटका बसला. तसेच हिरडस मावळ खोर्‍यात भात काढणी झाली असून, जनावरांसाठी ठेवलेला पेंढा भिजून गेल्यामुळे तो खराब होण्याची शक्यता शेतकर्‍यांना वाटू लागलेली आहे. यामुळे जनावरांच्या चार्‍याची टंचाई निर्माण होणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT