Latest

मुंबई : अवकाळीमुळे हापूसची आवक आणखी आठवडाभर लांबणीवर

मोनिका क्षीरसागर

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा
एपीएमसीत फेबु्रवारी आणि मार्च महिन्यांत कोकण हापूसची दररोज 10 हजार ते 24 हजार पेट्या आवक झाली. एप्रिलमध्ये ही संख्या 24 ते 25 हजार पेट्यांवर गेली. आता त्यात वाढ होत असून, 15 एप्रिलला 26 हजार 712 पेट्यांची आवक झाली. हापूसचे दर दोन ते पाच डझनांच्या पेटीला 1500 ते 4500 रुपये आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे हापूसची मुबलक प्रमाणातील आवक आणखी आठ दिवस पुढे जाण्याची शक्यता घाऊक व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

एपीएमसीमध्ये येणारा 50 टक्के हापूस आंबा निर्यात होतो, तर उर्वरित मालाची व्यापारी विक्री करतात. यंदा हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे हापूसला फटका बसला आहे. 28 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान 1 लाख 16 हजार 694 पेट्यांची आवक झाली. त्यानंतर रोज सरासरी 23 ते 24 हजार पेट्या दाखल होत होत्या. पाडव्यापासून हापूसची आवक वाढेल, असा अंदाज होता. परंतु, अवकाळी पावसामुळे मोहर गळून पडल्याने आवक कमी झाली.

1 एप्रिल ते 15 एप्रिलदरम्यान 2 लाख 51 हजार 337 पेट्या हापूस मुंबई एपीएमसीत आला. अवकाळी पावसामुळेबसलेल्या फटक्याचा हापूस निर्यातीसह घाऊक व्यापारावर परिणाम जाणवू लागला आहे. 15 एप्रिलपासून रोज सरासरी 35 ते 40 हजार पेट्यांची आवक व्यापार्‍यांना अपेक्षित होती. मात्र, अवकाळी पावसामुळे हापूस आंब्यावर डाग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा डागी मालास बाजारात अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

निर्यातीसाठी आवश्यक तेवढा कोकण हापूस आंबा बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत मागणी असूनही पुरेसा माल नसल्यामुळे हापूस व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रविवारपासून काही प्रमाणात हापूसची आवक
वाढण्याची अपेक्षा व्यापार्‍यांनी व्यक्त केली.अवकाळी पावसामुळे हापूस मुबलक प्रमाणात एपीएमसी बाजारात येण्यासाठी आणखी आठ दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल, असे एपीएमसी बाजारामधील घाऊक व्यापार्‍यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT