पुढारी ऑनलाईन : दक्षिण आशियातील देशांशी व्यापार भारतीय चलनातून करता यावा यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी दिली आहे. सरकारच्या प्रयत्नांना यश आले तर दक्षिण आशियातील देशांतील व्यापार वाढीस लागेल, यातून मोठी रोजगार निर्मिती होईल, असे दास म्हणाले. (Cross border rupee trade)
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी डिजिटल चलनाबद्दल काळजीपूर्वक पावले उचलली जात आहेत, असे ते म्हणाले. तसेच सीमेपलीकडील व्यवहार रुपयांत होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
२०२२ आणि २३ साठी जागतिक संकेत लक्षात घेतले तर दक्षिण आशियातील देशांतर्गत व्यापार वाढवणे विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. " समान उद्देश आणि आव्हाने यावर एकमेकांकडून शिकणे हे केंद्रीय बँक म्हणून महत्त्वाची बाब असते. डिजिटल चलनाच्या बाबतीत एक पाऊल टाकलेले आहे. तसेच सीमेपलीकडील व्यवहारही रुपयामध्ये व्हावेत यासाठी प्रयत्नसुरू आहेत."
दक्षिण आशियातील देशांसमोरील कोव्हिड, महागाई, रशिया – युक्रेन युद्ध आणि वित्तीय बाजारातील समस्या ही मोठी आव्हाने आहेत, असे ते म्हणाले. काही दिवसांपासून वस्तूंच्या किमती कमी येत आहेत, तसेच पुरवठा साखळीही सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे महागाई नियंत्रणात येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा