मुंबई : पुढारी ऑनलाईन : मागच्या दोन महिन्यांपासून क्रूज ड्रग्स केससंदर्भात मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. दरम्यान, नवाब मलिकांनी काल (दि.१०) रात्री ट्विट (Nawab Malik Tweet) केले आहे. आज (दि.११) माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत.
आम्ही न घाबरता त्यांचे स्वागत करणार आहे. महात्मा गांधीजी इंग्रजांविरोधात लढले होते. आम्ही चोरांविरोधात लढणार असल्याचे मलिकांनी स्पष्ट केले आहे. मलिकांनी त्यांची घरी छापा पडणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे.
नवाब मलिक म्हणाले, "मी ऐकलंय की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. घाबरणं म्हणजे दररोजचं मरणं आहे. आम्हाला घाबरायचं नाही, तर लढायचं आहे. गांधी इंग्रजांविरोधात लढले, आम्ही चोरांविरोधात लढू, अशा आशयाचे त्यांनी ट्विट करत थेट दावाच केला आहे.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर काही जणांना ऑक्टोबरमध्ये मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रूझवर टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. त्याचवेळी मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईबाबत समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्य न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. गेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावले होते. तसेच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते. नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.