पुढारी ऑनलाईन डेस्क : दसरा मुहूर्तावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या झेंडुच्या फुलांना योग्य भाव न मिळाल्याने, शहरातील रस्त्यांवर फुलांचा ढिगल तसाच सोडून शेतकऱ्यांना घरी जावे लागल्याचे चित्र मंगळवारी ता. 24 रोजी दिसून आले. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभर दसरा, विजयादशमीचा सोहळा आनंदात, उत्साहात पार पडला. सकाळी -सकाळीच शेतकर्यांनी पुजेसाठी लागणारी झेंडुची फुले शहरात आणली होती. 70,80 रू किलोचा भाव होता.
नागरीकांनी, लगबग करून फुलांची खरेदी केली. दुपारी भाव गडगडले. खरेदी होईना. त्यामुळे, भावात आणखी घसरण होत गेल्याने, दहा रू किलोने फुलांची विक्री करायची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने, मोठ्या आशेने फुलांचे पोते, गाठोडे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना निराशा आली. पाहिजे तसा भाव आला नाही. अक्षरश: फुलांचा ढिग आहे त्या स्थितीत सोडून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शहरातील रस्तोरस्ती फुलांचे मोठ मोठे ढिग पडल्याचे वेदनादायक चित्र दिसून आले. सकाळी देवघरात लागणारी फुले त्याच दिवशी रस्त्यावर पडली होती. फुले मातीमोल झाली. मोठ्या कष्टाने, मेहनतीने पिकवलेल्या झेंडुच्या फुलांना योग्य भाव न मिळाल्याने, शेतकरी बाप फुलांचा ढिग तसाच सोडून रिकाम्या हाताने घरी जावे लागले.
काही शेतकऱ्यांनी मोफत फुले दिली. सणाच्या दिवशी दुपारी पाच वाजता नागरिक सिमोल्लंघन करायला घराबाहेर पडले. त्यामुळे, फुलांची खरेदी थांबली. नाइलाजाने शेतकऱ्यांनी फुलांचा ढिग सोडून गाव जवळ करायचा निर्णय घेतला. एवढे कष्ट करून ही योग्य भाव न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर रंगीबेरंगी फुलांचे ढिगल, सडा पडला होता. मोकाट जनावरांनी फुलांवर ताव मारला. गेवराई जि.बीड शहरातील चित्र निराशाजनक होते. सामाजिक कार्यकर्ते आवेज [राजे] शरीफ यांनी पत्रकारांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून माहिती दिली. कष्ट करून ही योग्य भाव मिळत नसेल तर कशाला करायची शेती ? असा सवाल त्यांनी केला. त्यांनीच घटनास्थळी जाऊन फोटो काढले व पत्रकार मित्रांना पाठवले. जबाबदारी निश्चित नसल्याने सरकारचे हे अपयश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.