मराठा आरक्षण : लातूरमध्ये आंदोलनाचा वणवा; 200 पेक्षा जास्त गावांत नेत्यांना गावबंदी, जरांगे पाटलांना पाठबळ | पुढारी

मराठा आरक्षण : लातूरमध्ये आंदोलनाचा वणवा; 200 पेक्षा जास्त गावांत नेत्यांना गावबंदी, जरांगे पाटलांना पाठबळ

लातूर, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सकल मराठा समाजबांधवांनी आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा मनोदय केला आहे. अनेक गावांत साखळी उपोषण सुरू झाले आहे. गावांच्या वेशीवर तसेच गावाबाहेर पुढाऱ्यांना गावबंदी असे फलक झळकत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा अधिक गावांत उपोषण सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे. (Latur Maratha Andolan)

मांजरा पट्यातील गाधवड, वाजंरखेडा, बोडका, वाकडी, जोड जवळा, सारसा, टाकळगाव, तांदुळजा, कानडी बोरगाव, एकुर्गा, ढाकणी, निवळी, बोरगाव काळे, कळी, तांदुळवाडी, काटगाव, ढोकी, पिपंरी, शिराळा, चिंचोळी ब, पिंपळगाव अंबा, भिसे वाघोली, खुंटेफळ, माटेफळ, खंडाळा, इसुरी, भोसा, निलकंठ, कासार जवळा, मसला, वाडी वाघोली, मुरुड आदी गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. व अनेक गावांनी तसे फलकही गावाच्या दर्शनी भागात लावले होते. (Latur Maratha Andolan)

चाकूर तालुक्यातील जानवळ जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावांनी साखळी उपोषणसुरू केले आहे. हे उपोषण जानवळ यथील हनुमान मंदीरासमोर होत असून यात जानवळ, महाळंगी, झरी (बु.), हाडोळी, बेलगाव, जडाळा, हिंपळनेर, नांदगाव, दापक्याळ येथील मराठा बांधव दररोज एक गाव याप्रमाणे या उपोषणात सहभागी होणार असल्याचे तेथील मराठा बांधवांनी सांगितले.

देवणी तालुक्यातील बोरोळ येथेही उपोषण सुरू झाले आहे. उदगीर तालुक्यातील २० ते २२ गावात पुढाऱ्यांना प्रवेशबंदीचे फलक झळकले आहेत. निलंगा तालुक्यातील राठोडा, गौर, मसलगा, लांबोटा, लिंबाळा, शेडोळ, भुतमुगळी आदींनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. अहमदपूर तालुक्यात जिल्हा परिषद सर्कल निहाय साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. अहमदपूर शहरालगत असलेल्या जवळगा येथे आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कँडल मार्च काढण्यात आला. रेणापूर तालुक्यातही आरक्षणाच्या आंदेलनाची धग कायम असून २५ गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. तर १५ गावांत साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. औसा तालुक्यातील उजनी, तावशी ताड, बेलकुंड, गुळखेडा, लखनगाव व एऱ्ंडी सारोळा येथे गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील ३२ गावांनी गावबंदीचा ठराव घेतला असून तिथे साखळी उपोषण सुरू होत आहे.

हेही वाचा 

Back to top button