नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारत देशाला दिशा देणाऱ्या संवैधानिक मुल्यांची जपणूक करत, अमृतकालातील विकासयात्रेत महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेवून जावूया, असा विश्वास आज उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कस्तुरचंद पार्कवर आयोजित ७४ व्या भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून देशाच्या एकूण निर्यातीतही २२ टक्के हिस्सा आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचा या विकास यात्रेत सहभाग करून घेत महाराष्ट्राला पुढे घेवून जाण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूर ही परिवर्तनाची भूमी आहे. शहराचा हा उज्ज्वल वारसा पुढे घेवून जाण्यात प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. येत्या मार्च महिन्यात जी-२० परिषदेचे आयोजन नागपूर शहरात होत आहे. या निमित्ताने परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना सुंदर व संपन्न नागपूरचे दर्शन घडविण्याचे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.
शहरामध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने पार पडलेली राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस आणि राष्ट्रीय फार्मास्युटीकल परिषद हे आयोजन शहराचा मान वाढविणारी ठरल्याचेही फडणवीस यांनी अधोरेखित केले.
प्रारंभी फडणवीस यांनी ध्वजारोहण करून भारतीय ध्वजास वंदन केले. नागपूर पोलीस, होमगार्ड, छात्रसेना, स्काऊटगाईड आदी १७ पथकांचे खुल्या जिप्सीमधून निरीक्षण केले. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या नेतृत्वात या सर्व पथकांनी मुख्य मंचासमोरून पथ संचलन केले. फडणवीस यांनी या सर्व पथकांची मानवंदना स्वीकारली. अश्वदल, श्वानपथक आणि अग्नीशमनदलाचेही यावेळी पथसंचलन झाले. जिल्हा क्रीडा परिषदेचा चित्ररथ या पथसंचलनात सहभागी झाला. विद्यार्थ्यांनी या चित्ररथावर मल्लखांबासह योगासनांचे प्रात्याक्षिक सादर केले.