जळगाव : मला जेलमध्ये टाकून यांना निवडणुका सुखरूप करायच्या आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. विरोधक रोजच म्हणत आहे, कुछ ना कुछ होने वाला है… मात्र, काहीच होणार नाही, मी तुमच्या उरावर बसणार आहे, या शब्दात खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रेनिमित्ताने सभा पार पडली. यावेळी एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.
विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काहीना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा यांचा प्रयत्न असून तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला, तरी मी सर्वांच्या उरावर बसेन, या शब्दात एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावर एकनाथ खडसे म्हणाले, शिंदे सरकारच्या आमदारांमध्ये जी अस्वस्थता आहे, ते बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावरून समोर आली आहे. ज्यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे, त्या अपक्ष असो की इतर सर्व आमदार यांच्यात अस्वस्थता आहे. तीच अस्वस्थता आता हळू हळू बाहेर पडायला लागली आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि पुढे अजून काय होत ते पाहा, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.