पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल खान दुर्रानी यांच्या लग्नाविषयी हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. खूप मोठ्या अडचणीनंतर तिचे लग्न ट्रॅकवर आले होते. आदिल खान दुर्रानीनेदेखील राखीसोबत आपले नाते कबूलही केले होते. पण, आता पुन्हा दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राखीने आदिलवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. (rakhi sawant)
राखी सावंत मागील काही दिवसांपासून मीडियासमोर रडताना दिसत आहे. तिने आदिलचे दुसऱ्या तरुणीशी अफेअर असल्याचे म्हटले होते. आता राखीने पुन्हा आदिलविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. राखी सावंत म्हणाली-आदिलने तिचा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी वापर केलाय.
राखी सावंत म्हणाली, 'लोक माझी चेष्टा करत आहेत. त्यांना हे सर्व ड्रामा वाटत आहे. त्यांच्या घरीदेखील बहिण-मुली आहेत. जर त्यांच्यासोबतही असं घडलं असतं तर त्यांनी अशीच मस्करी केली असती का? माझी आई जाऊन ४ दिवसदेखील झाले नाही, हे माझं नाटक नाहीये.'
राखीने म्हटले की, 'तो (आदिल खान) काल माझ्यावर हसत होता. म्हणत होता की, लोक माझी मस्करी करत आहेत. तो (आदिल खान) म्हणाला की, मी हिरो बनलो आणि तू जोकर.'
मागील काही दिवसांमध्ये राखी सावंतने आदिल खान दुर्रानीसोबत आपल्या लग्नाचे फोटोज शेअर केले होते. त्यानंतर राखीने खरंच लग्न केलं आहे का, याची चर्चा सुरू झाली होती. त्याचसोबत राखीने खुलासा केला होता की, तिचं लग्न जवळपास ७ महिन्यांआधी झालं असून आदिलने तिला ही गोष्ट लपवण्यासाठी सांगितली होती. राखीने त्यावेळी आदिलचे कुण्या दुसऱ्या तरुणीसोबत अफेअर असल्याचेही म्हटले होते. खूप आव्हानानंतर आदिलने राखीसोबत आपलं नात कबूल केलं होतं.
राखीची आई जया भेडाच्या निधनानंतर आदिल राखीला सावरतानाही दिसला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा दोघे या वेगळे झाल्याचे म्हटले. राखी सावंतचे म्हणणे आहे की, आदिल खानचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे आणि आता तो घटस्फोट देण्याची धमकी देत आहे.