पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्या प्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.
Diwali Festival : दिवाळीचा पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक सामान यांच्या खरेदीला मोठे महत्व आहे. सोबतच पाडव्याच्या मुहूर्तावर खादीचे कापड खरेदी करण्याचीही परंपरा आहे. तसे तर संपूर्ण पाडवा हा मुहूर्त असतो. मात्र त्यातही शुभ मुहूर्त असतात. दिवसभरात वहीपूजन, आणि खरेदीचा मुहूर्त खालीलप्रमाणे
पहाटे ३:३० ते ६:३०, सकाळी ६:३० ते ९:३०, सकाळी ११:०० ते १२:३०
Diwali Festival : यमद्वितीया (भाऊबीज) ओवाळणीचा मुहूर्त
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
वर्षभरातील इतर सण-उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात – कुटुंबात एकोपा राखला जातो.
प्रत्येक धर्मियांच्या सण – उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी-विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते. अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगती होण्यात या सण-उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.
Diwali Festival : भाऊबीज ओवाळणीचा मुहूर्त
यावर्षी यमद्वितीया तिथी दोन दिवस आहे. त्यामुळे भाऊबीज देखील 26 आणि 27 ऑक्टोबर या दोन दिवशी आहे. त्यामुळे नेमके कोणत्या तारखेला भाऊबीज ओवाळणी करावी असा संभ्रम आहे. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.43 वाजेपर्यंत भाऊबीज सण साजरा करणे शुभ राहील. ही तिथी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 01.18 ते 03.30 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरा करणे शास्त्रानुसार योग्य असेल. मात्र जे लोक उदय तिथी मानतात तिथे 27 ऑक्टोबरला भाऊबीज ओवाळणी केली जाऊ शकते. जे 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी करतील त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त 11:07 ते 12:46 मिनिटे असा असणार आहे.
हे ही वाचा :