पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकार पडणार…असे म्हणायचे. आता ज्योतिषी थकले आहेत. आता ते मुख्यमंत्री बदलणार असे म्हणत आहेत. आधीच्या भागातील सीन काहींना आवडले नाहीत. काहीजण अर्ध्यातून उठून गेले होते. दुसऱ्या भागाचे हिरो मुख्यमंत्री असतील? असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. (Dharmaveer 2 Movie)
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित चित्रपट 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच 'धर्मवीर-२'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसरा भागाचे नाव आता 'धर्मवीर : २ मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' असे आहे. आज या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. 'धर्मवीर २' चित्रपटाच्या मुहूर्त शॉटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बोलत होते.
दिघे साहेबांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण
धर्मवीर आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्याचेच आम्हीही अनुकरण करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार, सरकार जाणार… असे म्हणायचे. आता ज्योतिषी थकले. गेली वर्ष, सव्वा वर्ष आम्ही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. आमचं सरकार मजबूत होत गेलं. आमच्याकडे आता २०० प्लस आमदार आहेत. म्हणून आता म्हणायला लागले मुख्यमंत्री बदलणार. तारीख पे तारीख चालू आहे. आता ३१ डिसेंबर, चांगले आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
दिघे साहेबांचे कार्य प्रचंड ते एका भागात मावणार नाही. 'धर्मवीर २' चित्रपटाचे आता ठाण्याच्या अनेक भागांत शूटिंग होणार आहे. लवकर शूटिंग सुरु होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना स्पष्ट केले. कार्यक्रमाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण तरडे, प्रसाद ओक उपस्थित होते. (Dharmaveer 2 Movie)
अभिनेता प्रसाद ओक यांनीदेखील 'धर्मवीर २' चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रमुख अभिनेते प्रसाद ओकसह दिग्दर्शक प्रवीण तरडे, महेश लिमये, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी आदी दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेता प्रसाद ओकने लिहिलं आहे, 'धर्मवीर २' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…" असे म्हटले आहे.
प्रवीण तरडे यांनाही काही सीन आवडले नव्हते..
धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतः प्रवीण तरडे यांनाही चित्रपटातील काही प्रसंग आवडले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. कलाकार हे मूडी असल्याने त्यांची समजूत प्रेमाने काढावी लागते, तरडे यांची समजूतही प्रेमाने काढली असल्याचे त्यांनी सांगितले.