Gadchiroli News : नक्षलग्रस्त कसनसूर गावासाठी पहिल्यांदाच सुरु झाली बस | पुढारी

Gadchiroli News : नक्षलग्रस्त कसनसूर गावासाठी पहिल्यांदाच सुरु झाली बस

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील कसनसूर येथे जाण्यासाठी परिवहन महामंडळाने घोट, कोटमीमार्गे बस सुरु केली आहे. संविधानदिनी परिवहन महामंडळाने कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. (Gadchiroli News)

कसनसूर हे एटापल्ली तालुक्यातील प्रमुख गाव असून कसनसूरसह कोटमी, रेगडी, घोट इत्यादी गावांमध्येही पोलीस ठाणे, केंद्रीय राखीव दलाचे कॅम्प, आश्रमशाळा आणि वनविभागाची कार्यालये आहेत. या परिसरातील गावे दुर्गम आणि नक्षलग्रस्त आहेत. मात्र, बसेसचा अभाव असल्याने सामान्य नागरिकांसह विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयी ये-जा करणे अवघड होत होते. गडचिरोली येथून कसनसूरला जाण्यासाठी पेंढरी, जारावंडी मार्गे बस होती. (Gadchiroli News)

परंतु, कोटमी, रेगडी, घोट मार्गावरुन बस नव्हती. ती सुरु करावी, अशी मागणी त्या भागातील नागरिकांनी केली होती. परंतु, अनेक वर्षांपासून ही मागणी रखडली होती. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, केंद्रीय राखीव दलाचे कमांडंट परविंदरसिंह, द्वितीय कमांडंट नरेंद्र सिंह यांनीही बस सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर परिवहन महामंडळाने ही मागणी पूर्ण केली आहे.

संविधानदिनी २६ नोव्हेंबरला केंद्रीय राखीव दलाच्या १९२ बटालियनचे सहायक कमांडंट अतुल प्रतापसिंह, कसनसूर उपपोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बोरसे, जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बसचा शुभारंभ करण्यात आला. गडचिरोली येथून ही बस दररोज दुपारी ३ वाजता सुटणार असून, कसनसूर येथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर कसनसूर येथून सकाळी ७ वाजता सुटणार आहे. ही बस कसनसूर येथून कोटमी-विकासपल्ली-रेगडी-घोट-चामोर्शी मार्गे गडचिरोलीला पोहचणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button