पुढारी ऑनलाईन डेस्क : आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आज (७ मे) चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. हे वर्षातील पहिले चक्रीवादळ असेल. जागतिक हवामान संघटनेने (WMO) या संभाव्य वादळाला 'सायक्लोन मोचा' असे नाव दिले आहे. मोचा चक्रिवादळ बंगालच्या हवामानावर तसेच संपूर्ण उत्तर भारतावर परिणाम करेल. त्याचबरोबर ९ ते १२ मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. (Cyclone Mocha ) मोचा चक्रिवादळ १२ मे पर्यंत उत्तर, ईशान्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात सरकेल.
हवामान खात्याने मच्छिमारांना रविवारपासून (दि.७) आग्नेय बंगालच्या उपसागरात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात असलेल्या लोकांना ७ मे पूर्वी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय मध्य बंगालच्या उपसागरातील लोकांना ९ मे पूर्वी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ८ ते १२ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटांजवळ पर्यटन, ऑफशोअर क्रियाकलाप आणि शिपिंगचे नियमन करण्यात यावे, असेही सुचवले आहे.
जागतिक हवामान संघटनेनेच्या मते, या वर्षी मे-जुलै दरम्यान अल निनोचा ही प्रभाव वाढण्याची ६०% शक्यता आहे. जून-ऑगस्टमध्ये सुमारे ७०% आणि जुलै-सप्टेंबर दरम्यान ८०% पर्यंत वाढेल. एल निनो सरासरी दर २ ते ७ वर्षांनी येतो आणि त्याचा परिणाम अंदाजे ९ ते १२ महिने टिकतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात एल-निनोची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात जाणवू शकतो. हा अंदाज कृषी क्षेत्रासाठी चिंतेचा विषय आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत असतानाचा, मोचा चक्रिवादळाच संकट आलं आहे. याचा परिणाम राज्यातील मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर, मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा