नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाचा १३८ वा स्थापना दिवस गुरूवारी (दि.२८) नागपूरच्या ऐतिहासिक भूमीत महारॅलीने साजरा केला जात आहे. शेतकरी, बेरोजगार, भ्रष्टाचार विरोधी लढाईसाठी 'है तैयार हम..' असा संदेश या महारॅलीतून देशातील जनतेला दिला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. Congress Rally
नागपुरातील ज्या दिघोरी टोल नाका परिसरातील मैदानात हा मेळावा होत आहे. त्याला 'भारत जोडो मैदान' असे नाव दिल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. Congress Rally
स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरमधूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले, हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे.
आज देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. भाजपा सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे, महागाई कमी करणे, शेतकरी, कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे आणि त्यासाठीच 'है तैयार हम' अशी संकल्पना आहे.
दरम्यान, ईव्हीएम संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, लोकांना वाटते त्यांचे मत दुसऱ्या पक्षाला जाते. त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, ही जर लोकांची मागणी असेल, तर त्याची दखल केंद्र सरकारने व निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी ईव्हीएमला विरोध करत होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अतुल लोंढे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा