पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने राजघाटवर आज दिवसभर 'संकल्प सत्याग्रह' केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या सत्याग्रहात सहभागी झाले आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली असून परिसरात कलम 144 लागू केले आहे.
राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर तसेच लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याने काँग्रेसकडून देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेसने शनिवार हा काळा दिवस म्हणून पाळला होता. आज काँग्रेसकडून राजघाटावर संकल्प सत्याग्रह करत आहे. "भाजप राहुल गांधींना बोलू देत नाही. राहुल गांधी देशासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी लढत आहेत. आज आम्ही महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ सत्याग्रह करणार आहोत" असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी काँग्रेस पक्षाला राजघाटवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्याचे कारण वाहतूक व्यवस्थापन दिले असून परिसरात CrPc चे कलम 144 लागू केले आहे. काँग्रेस मात्र राजघाटवर संकल्प सत्याग्रह करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते सत्याग्रहात सामील झाले आहेत.
तुरुंगात डांबून माझा आवाज दाबता येणार नाही, मी प्रश्न विचारणे बंद करणार नाही, अदानींचे मोदींसोबत काय संबंध आहेत? त्यांच्या कंपन्यांत 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? हे विचारत राहीन. मी माफी मागणार नाही, भारताच्या लोकशाहीसाठी लढत राहीन, असे उद्गार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढले. देशाची लोकशाही धोक्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रश्न विचारणे बंद करणार नाही. अदानींचे मोदींसोबत काय संबंध आहेत? 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? हे विचारत राहीन. या लोकांची कुठलीही भीती वाटत नाही. चुकीची कारवाई करीत, धमकी देत, तुरुंगात डांबून ते माझा आवाज दाबू शकतील, असे त्यांना वाटल असेल; तर हा माझा इतिहास नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन. मी कुठल्याही गोष्टींना घाबरणार नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा दाखवला.
थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवत राहुल म्हणाले की, अदानींबाबत मी करणार असलेल्या भाषणाची भीती पंतप्रधानांना होती. त्यांच्या डोळ्यांत ही भीती मी बघितली. त्यामुळेच मला अपात्र ठरवण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले. समर्थन करणार्या सर्व विरोधी पक्षांचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले, सर्वांनी सोबत मिळून काम करायचे आहे. सरकारकडून करण्यात येणार्या कारवाईमुळे विरोधकांना बळच मिळेल, असे ते म्हणाले.
सभागृहात अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांबद्दल विस्ताराने बोललो. त्यांचे मित्रत्व नवीन नाही, जुनेच आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून त्यांचे सख्य आहे. विमानातील फोटो मी दाखवला. या फोटोत मोदीजी त्यांच्या मित्रासोबत आरामात बसले होते. हाच प्रश्न मी उपस्थित केला. परंतु, माझ्या प्रश्नाला सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आले, अशी टीकाही गांधी यांनी केली.
हेही वाचा :