Latest

अहमदनगर, शिर्डी लोकसभेवर काँग्रेसचा दावा

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या शिर्डी व अहमदनगर या दोन्ही जागा काँग्रेसला मिळाव्यातच; शिवाय नगर शहर विधानसभा मतदारसंघही काँग्रेसने लढवावा, अशी आग्रही मागणी शुक्रवारी (दि. 2) मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली. त्यात शुक्रवारी दुपारी अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघाबाबत चर्चा झाली.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, बंटी पाटील, नसीम खान, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे आदी नेत्यांसमोर जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र नागवडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, करण ससाणे, विनायक देशमुख, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, मंगल भुजबळ, उत्कर्षा रूपवते, अमृत धुमाळ, संभाजी माळवदे, अनिल चुडीवाल, वाघमारे, प्रशांत दरेकर, भाऊसाहेब नेटके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेत असताना सदरची मागणी केली.

नगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवार करावे, अशी मागणी यापूर्वीच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. मुंबईतील बैठकीत किरण काळे म्हणाले, दक्षिण लोकसभा काँग्रेस लढत नाही. सहा विधानसभांपैकी एकही जागा काँग्रेस लढत नाही. दक्षिणेमधील कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल तर या विभागातून काँग्रेसचे किमान दोन आमदार असणे आवश्यक आहे. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.

या ठिकाणी काँग्रेस पक्ष संघटना अत्यंत ताकदीने काम करत आहे. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक मतदारसंघ हा काँग्रेसकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये घेतला पाहिजे. यामुळे दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळू शकेल. दक्षिणेतून पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शतप्रतिशत निवडून येऊ शकतो. आजपर्यंत झालेल्या 18 लोकसभा निवडणुकांपैकी 12 वेळा काँग्रेसचा खासदार सुमारे 46 वर्ष या मतदारसंघातून निवडून आला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अपवाद वगळता 4 वेळा भाजपने या ठिकाणी नेतृत्व केले आहे.

मात्र सध्याच्या भाजप उमेदवाराबद्दल दक्षिण मतदारांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. त्यामुळे काँग्रेस हा मतदारसंघ निश्चितपणे जिंकू शकते. जागावाटपाच्या वाटाघाटीवेळी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला जावा. कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणतील, अशी भूमिका या वेळी काळे यांनी मांडली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीदेखील दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी भूमिका नेतृत्वासमोर मांडली. दक्षिणेतील पदाधिकार्‍यांनी देखील यावेळी तसा आग्रह नेत्यांसमोर धरला.

म्हणून हवेत हे मतदारसंघ…

महाविकास आघाडीमध्ये शिर्डीची लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. परंतु शिवसेनेचे विद्यमान खासदार हे शिंदे गटात गेल्याने तेथे स्थानिक दुसरा सक्षम उमेदवार नसल्यामुळे व शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचाच पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे तो काँग्रेसकडेच राहावा. तसेच यापूर्वी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सातत्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे.

परंतु मागील चार लोकसभा निवडणुकांत सदर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असल्यास निश्चितपणे निवडून येऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी चर्चा या बैठकीत झाली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT