दापोली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाचे असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याने दापोलीत योगेश कदम समर्थकांनी आनंद साजरा केला. त्यानंतर शिवसेना दापोली शहर शाखा ताब्यात घेत असताना दोन्ही गटात राडा झाला. या वेळी ठाकरे गटाच्या मानसी विचारे यांना मारहाण झाल्याने त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आ.योगेश कदम समर्थकांनी दापोली शहर शाखा ताब्यात घेतली आहे. दरम्यान शहर शाखेजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दोन्ही गटाचे समर्थक पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.
या आधी देखील दापोली शहर शाखा आमदार योगेश कदम समर्थक यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वेळी दापोली पोलिसांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटविले होते. त्या नंतर या शाखेत ठाकरे गटाचे वर्चस्व होते. मात्र, शुक्रवारी रात्री आमदार योगेश कदम समर्थक यांनी ही शाखा ताब्यात घेतली आहे. दापोलीत पुन्हा एकदा दोन्ही गटात राडा झाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या राजकीय राड्या नंतर दापोलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दापोलीत चोख पोलीस बंदोबस्त आहे.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा आहे. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला आज शांती लाभेल. शिवसेना व धनुष्यबाण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांच्या हाती गेला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (दि.१७) खेड येथे दिली. शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
यावेळी ते म्हणाले, आजचा दिवस हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता. परंतु, मी या पूर्वीच सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा शिवसेना वाचवण्याचे काम केले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा आखलेला डाव खऱ्या अर्थाने उलटला गेला आहे. मी महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांचे अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे खेडमध्ये ५ मार्च रोजी सभा घेत आहेत त्यांची सभा झाल्यानंतर मी राज्यातील ३५ जिल्ह्यात सभा घेऊन शिवसेनेत नक्की काय घडत होते. हे महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे, असे रामदास कदम म्हणाले.