पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरासह राज्यात आज (दि.१९) मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन होत आहे. सर्वत्र भक्तिभावाचे, आनंददायी वातावरण आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंगलमय वातावरणात, भक्तिभावाने श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. यावेळी 'राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा दे' असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पाला घातले आहे. (CM Eknath Shinde)
गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. "चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ दे", असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करुन प्रतिष्ठापना केली. (CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री शिंदे यांनी नवीन संसद भवनावरही आपले मत व्यक्त केली. यावेळी त्यांनी नवीन संसद भवन अतिशय भव्य आणि सुंदर असून, सर्वसामान्य जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा हे कायदेमंडळ नक्की पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X वरून (पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे.