छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रामनवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटांत राडा झाला होता. यामुळे किराडपुऱ्यातील राम मंदिर परिसरात अशांतता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, आज शांततेत राम नवमी उत्सव साजरा केला जात आहे. दुपारी १२ वाजता राम भक्तांच्या प्रचंड उत्साहात आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केनेकर आदींची उपस्थिती होती. मंदिर परिसरात प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिसचा फौजफाटा येथे तैनात आहे.
राम नवमी पूर्वसंध्येला (दि.२९) रात्री किराडपुऱ्यातील राम मंदिरासमोर दोन गटात राडा झाला. त्यामुळे मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन गटात राडा झाल्यावर दगडफेक आणि जाळपोळ झाली. राम मंदिराची कमान जाळण्यात आली. पोलिसांच्या ८ वाहनांची तोडफोड करून, ती पेटवण्यात आली. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री १ वाजता सुरू झालेला राडा पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होता. यानंतर घटनास्थळी तात्काळ स्थानिक पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिसांची तुकड्या तैनात करण्यात आल्या. मात्र सध्या तेथे शांतता आहे. खा. इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी जाऊन शांतता राखण्याचे व्हिडिओ बनऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीही परिसरात भेट दिली आहे, त्यामुळे परिसरातील वातावरण निवळले आहे.