नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात दाखल झालेल्या राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेवर भाजप नेत्यांनी हल्लाबोल सुरु केला आहे. या यात्रेचा खर्च महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना काँग्रेसच्या नेत्यांनी कमावलेल्या काळ्या पैशातूनच केला जात आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 'भारत जोडो' यात्रेच्या खर्चासंदर्भात चौकशी करण्यासाठी आपण राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडे पत्र लिहिणार असल्याचे बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Bharat Jodo Yatra )
राहुल गांधी यांची ही यात्रा केवळ काँग्रेस नेत्यांच्या मुला-मुलींना राजकारणात पुढे आणण्यासाठीच असल्याची सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. मुळात या यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येण्याऐवजी अनेक नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. एकंदरीत राहुल गांधी यांची यात्रा या पक्षातील नेत्यांनी 'हायजॅक' केली असून त्यांच्या पक्षाला या यात्रेचा काहीही फायदा होणार नाही, असा दावा आ. बावनकुळे यांनी केला. मंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. (Bharat Jodo Yatra)
हेही वाचा