बंगळूर, वृत्तसंस्था : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्सचा सामना पाहण्यासाठी आली होती. ज्यांनी तो सामना पाहिला असेल त्यामध्ये अनुष्काचा आनंद आणि तिचा उत्साह किती मोठा होता हे त्यांना माहिती आहे. विराटने शतक ठोकल्यानंतर अनुष्काने त्यांचे फ्लाईंग किस देत केलेले कौतुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.
गुजरात आणि आरसीबीच्या सामन्यात जर बेंंगलार जिंकले असते तर मुंबईच्या पदरी निराशा आली असती. मात्र गुजरातच्या शुभमन गिलने जी खेळी केली त्याला तोड नव्हती. त्याने विराटच्या शतकाला जशास तसे उत्तर दिले आणि सोशल मीडियावर अनुष्का-विराटवरून प्रतिक्रियांना उधाण आले आहे. विराटने जेव्हा शतक साजरे केले त्यावेळी अनुष्काने त्याला तीनवेळा फ्लाईंग किस करत शुभेच्छा दिल्या. त्याचे कौतुकही केले होते. बेंगलोर पराभूत झाल्यानंतर विराटच्या चेहर्यावरील निराशा लपून राहिली नाही. त्याचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल झालेले मीम्स देखील भन्नाट असून त्यामध्ये अनुष्का शर्मा हिने तीनवेळा फ्लाईंग किस देऊनही बेंगलोरचा पराभव झाला, असे नेटकर्यांनी गंमतीत म्हटले आहे.
माझ्यातील टी-20 क्रिकेट अजून शिल्लक आहे : विराट कोहली
विराट कोहलीचे आता वय झाले असून त्याच्यातील टी-20 क्रिकेट संपत आहे, असा सूर लावणार्या टीकाकारांना विराटने चांगलेच फटकारले आहे. लीग फेरीच्या शेवटच्या सामन्यानंतर एका मुलाखतीत कोहली म्हणाला, 'अनेकांना वाटते की माझे टी-20 क्रिकेट आता संपत आहे, पण मला असे अजिबात वाटत नाही. मला वाटते की मी पुन्हा माझे सर्वोत्तम टी-20 क्रिकेट खेळत आहे. मी फक्त आनंद घेत आहे.'
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मोठमोठ्या फलंदाजांना आयपीएलमध्ये एकही शतक होत नाही आणि विराट कोहलीने सलग दोन शतके झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये तो आता एकामागोमाग दोन शतके झळकावणार्या निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे, तर त्याने ख्रिस गेलचा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडला आहे. आयपीएलमधील सातवे आणि सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने टीकाकारांवर निशाणा साधला आहे. त्याने अशा लोकांवर निशाणा साधला आहे, जे कोहलीची टी-20 कारकीर्द संपल्याचे अनेक दिवसांपासून वक्तव्य करत आहेत.
कोहलीचा स्ट्राईक रेट आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीविरुद्धची फलंदाजी यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते; परंतु आता त्याने सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध शतके ठोकून टीकाकारांना उत्तर दिले आहे.
कोहली टी-20 करिअरमध्ये 12 हजार धावांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आयपीएल, आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या टी-20 सह कोहलीने 374 सामन्यांमध्ये 41.40 च्या सरासरीने आणि 133.35 च्या स्ट्राईक रेटने 11,965 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा…