नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने नक्षलवाद्यांविरोधात २०१९ पासून विशेष रणनिती अवलंबली आहे. या धोरणामुळे २०१८ च्या तुलनेत २०२२ मध्ये देशातील नक्षलवादाशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांमध्ये ३९ टक्के घट झाली असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाने केला आहे. नक्षलवाद्यांसोबतच्या लढाईत सुरक्षा दलांनी दिलेल्या बलिदानाच्या संख्येत २६ टक्के आणि नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात ४४ टक्क्यांची घट नोंदवण्यात आल्याची समाधानकारक माहिती मंत्रालयाने दिली आहे.
गत पाच वर्षांमध्ये एकूण २ हजार ९७२ नक्षली हिंसाचाराच्या घटनांमध्ये ८२९ मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१४ पूर्वीच्या तुलनेत नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना ७७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. २००९ मध्ये सर्वाधिक २ हजार २५८ हिंसाचाराच्या घटनांची नोंद घेण्यात आली होती. २०२१ मध्ये या घटना ५०९ पर्यंतच मर्यादीत राहिल्या. नक्षली हिंसाचारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ८५ टक्क्यांनी कमी झाले आहे. २०१० मध्ये सर्वाधिक १ हजार ५ मृत्यू झाले होते. तर, २०२१ मध्ये १४७ मृत्यूची नोंद घेण्यात आली. २०१० मध्ये देशातील ९६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. २०२२ मध्ये या जिल्ह्यांची संख्या ३९ वर पोहचली आहे.
सुरक्षा दलाच्या नक्षलवादाविरोधातील या निर्णायक यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि राज्य सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गृह मंत्रालय नक्षलवाद आणि दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलता धोरण सुरूच ठेवेल आणि हा लढा आणखी तीव्र केला जाईल, अशी भावना शहा यांनी व्यक्त केली आहे.
वर्ष घटना मृत्यू
२०१८ ८३३ २४०
२०१९ ६७० २०२
२०२० ६६५ १८३
२०२१ ५०९ १४७
२०२२ २९५ ५७
हेही वाचा :