पुणे: पुढारी वृत्तसेवा
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या जिल्ह्यात 27 शाळा सुरू असल्याचे समोर आले. त्या शाळांची मान्यता काढण्यात आली आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये. या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात अनेकांनी परवानगी न घेता शाळा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या शाळांत शिकणार्या मुलांचे भवितव्य अडचणीत आले असून पालक घाबरले आहेत. मोफत शिक्षण कायद्यानुसार कोणतीही शाळा सरकार अथवा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सुरू करता येत नाही. मान्यता न घेता शाळा सुरू केल्याचे आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येते. तसेच एक लाखापर्यंतचा दंडही करण्यात येतो, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.
आयुष प्रसाद म्हणाले, 'पुणे जिल्ह्यात शिक्षण विभागाची परवानगी न घेता 27 शाळा गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्या शिक्षण संस्थांबाबत काही माहिती अधिकार्यांमार्फत प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे गटविकास अधिकार्यांनी शाळांमध्ये जाऊन पाहणी केली. त्या पाहणीनंतर 27 शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे. त्या शाळांवर आम्ही कारवाई केली आहे. तसेच शाळांची मान्यता काढून घेतली आहे. यात हवेली, पुरंदर, इंदापूर, खेड, मावळ, मुळशी, शिरूर या तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा हवेली तालुक्यात आहेत.
https://youtu.be/m5yyfqkYqY4