पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात आयोजित G20 परिषदेनिमित्त १२५ देशांमधील ३० हजारांहून अधिक प्रतिनिधी आमच्या 'अतिथी देवो भव' च्या भावनेचे साक्षीदार झाले. जगासाठी तयार असलेला भारत त्यांनी पाहिला आणि अनुभवला. राजधानी दिल्लीत झालेल्या G20 परिषदेला आम्ही एक जनआंदोलन बनवलं, अशा शब्दांमध्ये परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज ( दि. २६) भारताच्या भावना मांडल्या. संयुक्त राष्ट्र महासभेला ( युएनजीए) संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, आम्ही आफ्रिकन युनियनला जी 20 गटाचे कायमस्वरूपी सदस्य बनवू शकलो, हरित विकास करार आणि शाश्वत विकास उद्दिष्टे, भ्रष्टाचारविरोधी उच्च-स्तरीय तत्त्वे आणि कृती आराखडा तयार करू शकलो. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुपक्षीय विकास करारांच्या सुधारणांसाठी आम्ही आश्वासक प्रयत्न केले."
तरुणांना लक्ष्य करून, भारताने स्टार्टअप 20 एंगेजमेंट ग्रुपच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. G20 मधील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'युएनजीए'च्या वार्षिक संमेलनात डॉ.एस. जयशंकर यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सोमवारी, परराष्ट्र मंत्र्यांनी जागतिक संघटनेच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि महासभेच्या ७८ व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांची भेट घेतली होती.
हेही वाचा :