पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक प्रांतात 'बोली' या विषयी अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच ते ग्रंथ स्वरुपात असल्यास ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल. आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान आपण बाळगायला हवा, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. डॉ. मोनिका ठक्कर यांचे 'माझी बोली माझी कथा' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि . 4) मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी डॉ. मोनिका ठक्कर यांचे कौतुक केले. या पुस्तकात 'माझी बोली माझी कथा' या ५७ बोलीतील कथासंग्रहात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचाही समावेश आहे. (Kolhapur)
महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात. यातील काही बोलीभाषा आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने, वाचकांना ते रंजक वाटावे, आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणार्या बोली याचे ज्ञान जनसामान्य, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना मिळावे, बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करणे. त्या सोबतच त्याचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हे पुस्तक आहे. या पुस्तकात ५७ बोलीतील ५७ कथा आहेत. प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. या पुस्तकात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील 'झटाझोंब्या' कथेचाही समावेश आहे.
बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली, माझी कथा' असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे. डॉ. मोनिका ठक्कर यांनी आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि समन्वयाची भूमिका सांभाळली आहे.
हेही वाचा