जळगाव पुढारी वृत्तसेवा : तोल गेल्याने रिक्षातून खाली पडून अकरावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बस सेवा बंद असल्याने विद्यार्थिनी रिक्षातून प्रवास करत होती. दरम्यान रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसलेले असल्य़ाने विद्यार्थिनीचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील शेलवड येथील अकरावी मध्ये शिक्षण घेणारी तृप्ती भगवान चौधरी ही विद्यार्थिनी बस संप सुरू असल्याने रिक्षातून घरी जात होती. यादरम्यान तोल गेल्याने ती रिक्षातून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तीला बोदवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
मागील तीन-चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे बस सेवा बंद आहे. बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी यावे लागते. असेच तृप्ती चौधरी हिने पेपर दिल्यावर घरी जाण्यासाठी रिक्षातून जात असताना रिक्षातून पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.