बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीविषयी पुन्हा एकदा शी जिनपिंग यांच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिनपिंग हे गंभीर आजारी असल्याचा आणि त्यातून अस्वस्थ वाटत असल्यानेच त्यांनी भारताचा दौरा अवघ्या २४ तासांत आटोपता घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.
शी जिनपिंग १२-१३ सप्टेंबरदरम्यान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते; मात्र ते नवी दिल्लीत फक्त एक दिवसच थांबले. यावरून त्यांच्या विरोधकांसह समीक्षकांनी सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ब्रिक्स शिखर परिषदेतील बैठकीदरम्यान जिनपिंग यांना अस्वस्थ वाटत असल्याचे दिसल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण थांबवून त्यांच्याकडे ‘सर्व काही ठीक आहे ना’ अशी विचारणा केली होती. यानंतर जिनपिंग यांचे सहकारीही त्यांच्या दिशेने वेगाने धावले होते. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विश्लेषक चिनी नेत्याच्या प्रकृतीवर विविध दावे करू लागले आहेत.
चीनचे प्रखर समीक्षक व लेखक गॉर्डन जी. चांग यांच्या मते जिनपिंग यांची प्रकृती ठीक नाही. यावेळी चीन त्यांची अवस्था लपवू शकलेला नाही, तर अन्य एक चिनी समीक्षक जेनिफर झेंग यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या (सीसीपी) एका माजी अधिकाऱ्याचा हवाला देत शी जिनपिंग हे 'सेरिबेलर ॲट्रॉफी' या आजाराने ग्रस्त असल्याचा दावा केला. झेंग यांच्या मते, या आजाराचा सामना करणे खूप कठीण असते. कारण, शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे सेरिबॅलम सहजपणे प्रत्यारोपित करता येत नाही. विविध संकेत पाहता जिनपिंग खरोखरच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जात असण्याची मोठी शक्यता आहे.
अमेरिकेत निर्वासित झालेले चिनी राजकीय कार्यकर्ते जी वानजुन यांनी लिहिले, 'ब्रिक्स परिषद संपण्यापूर्वीच शी जिनपिंग भारत दौरा आटोपता घेत ठरलेल्या वेळेआधीच बीजिंगला परतले. विमानात चढताना जिनपिंग यांना चालताना त्रास होत होता. त्यांचे पाय अडखळत होते. शरीर वारंवार डाव्या बाजूला झुकत होते.'