संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी एफएओच्या कार्यक्रमात भारताच्या डिजिटल क्रांतीचे कौतुक केले.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

भारतात डिजिटल क्रांती! UN कडून कौतुक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस (UNGA President Dennis Francis) यांनी डिजिटल क्रांती आणि देशाच्या ग्रामीण भागात बँकिंग सेवांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या पाच ते सहा वर्षांत ८० कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे. केवळ स्मार्टफोनच्या वापराने ही क्रांती घडली आहे". (India digital revolution)

ग्रामीण भारतातील लोक पूर्वी बँकिंग अथवा पेमेंट सिस्टमचा वापर करत नव्हते. पण आता केवळ ते स्मार्टफोन वापरून बिल भरत आहेत आणि ऑर्डरसाठी पेमेंट मिळवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

भारतात स्मार्टफोनचा प्रभावी वापर

"डिजिटलायझेशन देशाच्या जलद विकासासाठी आधार देते. भारताचेच उदाहरण घ्या, गेल्या पाच-सहा वर्षांत केवळ स्मार्टफोनच्या वापराने भारताने ८० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे." असे फ्रान्सिस यांनी अन्न आणि कृषी संघटना (FAO) येथे 'वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी भूकमुक्तीच्या दिशेने वाटचालीचा वेग' या विषयावर बोलताना सांगितले.

ग्रामीण शेतकरी स्मार्टफोनवर व्यवहार करतात

त्यांनी भारतातील वेगवान इंटरनेट सुविधांचाही उल्लेख करत सांगितले की, स्मार्टफोनच्या वाढत्या लोकप्रियतेचा आणि देशातील बँकिंग सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी लाभ घेण्याचा हा एक प्रमुख घटक आहे. "भारतातील ग्रामीण शेतकरी ज्यांचा कधीही बँकिंग व्यवस्थेशी संबंध नव्हता, ते आता त्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या स्मार्टफोनवर करत आहेत. ते त्यांची बिले भरतात आणि ऑर्डरसाठी पैसे प्राप्त करतात. भारतात प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे" असेही डेनिस फ्रान्सिस यांनी नमूद केले आहे.

"परंतु जगातील दक्षिणेकडील बऱ्याच भागांमध्ये असे चित्र दिसत नाही. डिजिटलायझेशनच्या जागतिक फ्रेमवर्कसाठी वाटाघाटी करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून ही असमानता दूर करण्यासाठी काही प्रयत्न आणि पुढाकार घेणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले. (UNGA news)

१० वर्षांपासून मोदी सरकारचा डिजिटलायझेशनवर फोकस

गेल्या १० वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा डिजिटलायझेशनवर मुख्य फोकस राहिला आहे. २०१६ मध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. यात यूपीआय (UPI) चा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जन धन, आधार आणि मोबाइल उपक्रमांद्वारे डिजिटलायझेशन स्वीकारण्याचे आवाहन केले. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भारतातील लोकांसह लाखो लोकांनी त्यांची बँक खाती उघडली आहेत. बँक खाती आधारशी लिंक करण्यात आली आहेत. यामुळे लोक केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT