काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरामुळे रसुवा जिल्ह्यातील तब्बल सहा जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक नागरिक आणि कामगार अडकले आहेत. प्रतिकूल हवामान, उध्वस्त झालेले रस्ते, प्रचंड चिखल आणि ढिगार्यांच्या आव्हानांशी सामना करत नेपाळ सैन्य आणि नेपाळ सशस्त्र पोलीस दलाचे सुमारे ११,००० जवान इतिहासातील सर्वात कठीण मदत व बचाव मोहीम राबवत आहेत.
५०० लोक अडकल्याची भीती
पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य नेपाळ लष्कर आणि NAPF द्वारे संयुक्तपणे केले जात असून, यात लष्कराचे ७,००० आणि NAPF चे ४,००० जवान तैनात करण्यात आले आहेत. एनएपीएफचे प्रवक्ते आणि डीआयजी नेत्रबहादूर कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांचे मुख्य लक्ष अप्पर त्रिशुली, अप्पर त्रिशुली-१, रसुवा, त्रिशुली ३-ए, चिलिमे खोला आणि लांगटांग या जलविद्युत प्रकल्पांवर आहे. या ठिकाणी किमान ५०० लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, सततचा पाऊस आणि तुटलेल्या संपर्कामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. असे असले तरी, पाऊस उघडल्यानंतर कार्य वेगाने सुरू केले जाते. रसुवा येथील धुंचेपर्यंतचा रस्ता चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.
प्रचंड चिखल आणि खडकांमुळे अडथळे
जलविद्युत प्रकल्पांच्या परिसरात मोठे खडक आणि चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग रिकामा करणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. "ही आमची आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक मोहीम असून, आपत्तीच्या पहिल्याच दिवसापासून आमचे १३ जवान बेपत्ता आहेत," असे कार्की यांनी सांगितले.
६ वर्षांच्या चिमुरडीला ६० तासांनंतर जीवदान
या भीषण आपत्तीत एक आशेचा किरणही पाहायला मिळाला. रसुवा येथील तिमुरे परिसरात ६० तासांपेक्षा जास्त वेळ ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली 'मनीषा' ही ६ वर्षांची चिमुरडी सुखरूप बचावली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सुरक्षा जवानांनी तिला बाहेर काढले. मात्र, तिच्या पालकांचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही.
दरम्यान, नेपाळ सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बसनेत यांनी सांगितले की, त्रिशुली ३-ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात जमा झालेला चिखल आणि दगड बाजूला करून मार्ग तयार करण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे.