Pakistan Karachi water crisis
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणीवाटप करार स्थगित अवस्थेत असताना पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची भीषण पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात शहरातील सुमारे ७० टक्के भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर जमात-ए-इस्लामीचे प्रमुख हाफिज नईम-उर-रहमान यांनी यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील सिंध सरकारवर जवळपास दोन दशकांपासून प्रांतात सत्तेत असूनही कराचीच्या दीर्घकालीन पाणी समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
एआरवायच्या अहवालानुसार, गेल्या काही आठवड्यांत कराचीच्या जवळपास ७० टक्के लोकसंख्या ताहनेने व्याकुळ झाली आहे. गुलिस्तान-ए-जौहर, गुलशन-ए-इकबाल, अझीझाबाद, लियाकतबाद, उत्तर नाझिमाबाद आणि उत्तर कराची या भागांमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून तीव्र टंचाई जाणवत आहे.
ईदच्या दिवशी हाफिज नईम-उर-रहमान यांनी कराचीतील वाढत्या पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, ईदच्या सुट्ट्यांदरम्यान हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. सिंध प्रांतात गेली १८ वर्षे सत्तेत असलेल्या पीपीपी सरकारला अद्याप कराचीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही.
हाफिज नईम यांनी सिंध सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बोर्डवरही निशाणा साधला. तब्बल ४३ अब्ज रुपयांचा निधी मिळूनही कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात संस्था अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. सार्वजनिक निधीचा प्रभावी वापर होत नसल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, कराचीचे महापौर मुर्तझा वहाब यांनी शहरात पाणीटंचाई नसल्याचा केलेला दावा देखील हाफिज नईम यांनी फेटाळून लावला. माध्यमांच्या वृत्तानुसार, कराचीतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून शहरात नागरिकांना खासगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.