India Iran Travel Advisory US Strike Fears: भारताच्या तेहरान येथील दूतावासाने ईरानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना उपलब्ध सर्व वाहतूक मार्ग वापरून ताबडतोब देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. या सूचना आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्या आहेत. त्यात विद्यार्थी, व्यापारी तसेच पर्यटक या सर्वांना देश सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ईरान आणि अमेरिका यांच्यात पुढील काळात संघर्ष किंवा सैन्य कारवाई होण्याची शक्यता आहे, तसेच देशात नव्याने सुरू झालेल्या विरोधी मोर्च्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय दूतावासाने नागरिकांना अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः जिथे विरोधी आंदोलनं, मोर्चे किंवा निदर्शनं सुरू आहेत अशा भागांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ईरानमधील सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाशी सातत्याने संपर्कात राहावे आणि स्थानिक माध्यमांमधून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.
दूतावासाने आणखी एक महत्त्वाची सूचना देताना म्हटले की, पासपोर्ट, व्हिसा, ओळखपत्रांसह सर्व प्रवास आणि इमिग्रेशन कागदपत्रे नेहमी जवळ ठेवावीत. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा पासपोर्ट व इमिग्रेशन संदर्भातील मदतीसाठी थेट भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी दूतावासाने हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केले आहेत. ईरानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी गरज पडल्यास +98 9128109115, +98 9128109109, +98 9128109102, +98 9932179359 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. याशिवाय cons.tehran@mea.gov.in या ई-मेलवरही मदतीसाठी संपर्क साधता येईल.
तसेच, ईरानमध्ये वास्तव्यास असलेल्या ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप भारतीय दूतावासात नोंदणी केलेली नाही, त्यांना तात्काळ MEAERS पोर्टलवर (https://www.meaers.com/request/home) नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे जर ईरानमधून नोंदणी करणे शक्य नसेल, तर भारतातील त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या वतीने नोंदणी करू शकतात, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.
एकूणच, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि ईरानमधील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकार आणि दूतावासाने ही तातडीची पावले उचलली आहेत. ईरानमधील भारतीयांनी घाबरून न जाता, सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षित मार्गाने देश सोडणे हाच सध्या पर्याय असल्याचे दूतावासाने सांगितले आहे.