China speed up Dam in Pakistan
नवी दिल्ली/बीजिंग : जम्मू-काश्मिरमधील पहरगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप करार (Indus Waters Treaty) स्थगित केला. त्यावरून दोन्ही देशात तणाव असतानाच आता चीनने पाकिस्तानमधील मोहमंद धरण प्रकल्पाला वेग देण्याची घोषणा केली आहे.
या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे केवळ जलसुरक्षा आणि वीजनिर्मितीच नव्हे, तर पाकिस्तानच्या कृषी आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांवरही मोठा परिणाम होणार आहे. चीन एनर्जी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनकडून विकसित होणारे हे धरण, सध्या जलद गतीने बांधले जात आहे.
ही कृती चीनच्या पाकिस्तानप्रती असलेल्या मैत्रीपूर्ण भूमिकेचे लक्षण मानली जात आहे, चीनची ही कृती सिंधू जल वाटप कराराला प्रत्युत्तर म्हणून पाहिली जात आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार, या धरणावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू झाले आहे, जो बांधकामातील एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
त्यामुळे या प्रकल्पाच्या गतीमान विकास टप्प्याला सुरूवात झाली आहे. हा प्रकल्प चीनच्या सरकारी मालकीच्या चायना एनर्जी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनकडून विकसित केला जात आहे, ज्याने 2019 मध्ये काम सुरू केले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जलसंधीवरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीन पाकिस्तानमधील मोहम्मंद धरणाच्या बांधकामाला गती देत आहे. हा प्रकल्प जलविद्युत आणि जलसुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जातो.
मोहम्मंद धरण उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात स्वात नदीवर आहे. मोहमंद जिल्ह्यात हे धरण आहे. हे धरण मल्टीपर्पज काँक्रीट-फेस्ड रॉकफिल डॅम (सीएफआरडी) प्रकाराचे असून, पूर नियंत्रण, सिंचन, पिण्याचे पाणी आणि विजेचा पुरवठा अशा विविध कामांसाठी उपयोगी आहे.
हे धरण जगातील पाचवे उंच धरण ठरणार असून, याची उंची 700 फूट असेल. धरण पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर 800 मेगावॉट वीजनिर्मिती आणि दररोज 300 दशलक्ष गॅलन पाणी पेशावरला पुरवण्याची क्षमता असेल. तसेच, हजारो एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे आणि नदीखालच्या भागात पुरापासून संरक्षण मिळणार आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे काम 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या, वीज आणि सिंचन सुरंगांचे खोदकाम, स्पिलवे बांधकाम, मुख्य आणि अपस्ट्रीम कॉफरडॅमवर काम सुरू आहे. अनेक टप्पे वेळेच्या आधी पूर्ण होत असल्याचे सांगितले जाते.
प्रादेशिक तणावामुळे आणि चीनच्या सक्रीय सहभागामुळे प्रकल्पात आणखी गती आल्याचे दिसते.
दरम्यान, चीन सिंधू नदीवर डायमर-भाषा धरणासाठीही पाकिस्तानला मदत करत आहे. हा प्रकल्प खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तानच्या जवळ आहे. या प्रकल्पामुळे पाकिस्तानची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.
भारताने 22 एप्रिल 2025 रोजीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला) सिंधू जल वाटप करार निलंबित केला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाया झाल्या आणि नंतर युद्धविरामावर एकमत झाले, तरीही तणाव कायम आहे.
अशा परिस्थितीत चीनने मोहमंद प्रकल्पाला गती देण्याची घोषणा केल्यामुळे, पाकिस्तानशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे समर्थन असल्याचे दिसते.