पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग  File Photo
आंतरराष्ट्रीय

India–China Relations |'आम्ही शत्रू नव्हे...' : मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान

India–China Relations | भारत आणि चीनने एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहण्याऐवजी 'भागीदार' म्हणून पाहावे

पुढारी वृत्तसेवा

India–China Relations

बीजिंग : मध्य-पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक समीकरणे वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. बीजिंगमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीनमधील सुधारत असलेल्या संबंधांबाबत मोठे विधान केले आहे.

दोन्ही देश एकमेकांकडे भागीदार म्हणून पाहतात : वांग यी

वांग यी म्हणाले की, "भारत आणि चीनने एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहण्याऐवजी 'भागीदार' म्हणून आणि धोका समजण्याऐवजी 'संधी' म्हणून पाहावे. दोन्ही देश महत्त्वाचे शेजारी असून 'ग्लोबल साउथ'चे सदस्य म्हणून आपल्यात खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक सामायिक हितसंबंध आहेत."

भारत आमचा महत्त्वाचा शेजारी

'शिन्हुआ' या वृत्तसंस्थेनुसार, वांग यी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चीनच्या परराष्ट्र धोरणावर सविस्तर भाष्य केले. एका भारतीय पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध असून भविष्यातील प्रगतीसाठी सहकार्य आवश्यक आहे.

भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी वांग यी यांनी मांडलेली 'चतुःसूत्री':

  • दोन्ही देशांनी एकमेकांकडे शत्रू म्हणून न पाहता विकासाचे वाटेकरी म्हणून पाहावे.

  • सीमाभागात शांतता आणि स्थिरता राखण्यासोबतच 'शेजारी धर्म' पाळण्यावर त्यांनी भर दिला.

  • चालू वर्षी आणि पुढील वर्षी 'ब्रिक्स'चे अध्यक्षपद भूषवताना दोन्ही देशांनी एकमेकांना पूर्ण पाठिंबा द्यावा.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जबाबदारी सिद्ध करण्यासाठी दोन्ही देशांनी पाऊल पुढे टाकत परस्पर संबंधांतील अडथळे दूर करावेत.

परस्पर सहकार्य ठरेल फायदेशीर

"भारत आणि चीनमधील परस्पर विश्वास आणि सहकार्य हे सामायिक विकासासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याउलट, आशियाच्या पुनरुत्थानासाठी दोन्ही देशांमधील फूट किंवा संघर्ष घातक ठरू शकतो," असेही वांग यी यांनी नमूद केले.

दोन्ही देशांमधील संबंध आता पूर्वपदावर येत आहेत

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की, दोन्ही देशांमधील संबंध आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे भारत आणि चीन परस्पर सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 'तियानजिन'मधील भेटीचाही उल्लेख केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT