

अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष विमानांची सोय
५० हजारांहून अधिक भारतीय सुरक्षित मायदेशात
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील विमान सेवा विस्कळीतच
प्रवाशांना खबरदारीचा इशारा
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो आपल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी महत्त्वाची पावती दिली आहे. जेद्दाह आणि मस्कत ही शहरे विमान प्रवासासाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट करत, या ठिकाणची नियमित विमान सेवा सुरू राहणार असल्याचे कंपन्यांनी जाहीर केले आहे.
विविध देशांत अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाने कंबर कसली आहे. त्यानुसार ८ मार्च रोजी अबु धाबी, दुबई, मस्कत, रास अल-खैमाह आणि शारजाह येथून विशेष (नॉन-शेड्युल्ड) विमानांचे नियोजन करण्यात आले आहे. अडकलेल्या प्रवाशांना भारतात परत आणण्यासाठी एअर इंडियाने ८ मार्च रोजी अबू धाबी, दुबई, मस्कत, रास अल-खैमाह आणि शारजाह येथून ३० हून अधिक अतिरिक्त विमानांचे नियोजन केल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, एअर इंडियाची युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी विमाने सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करत असून, ही सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एअर इंडिया दिल्ली आणि मुंबई ते दुबई दरम्यान अतिरिक्त 'नॉन-शेड्युल्ड' विमाने चालवणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस भारत आणि युएईच्या शहरांदरम्यान (अबू धाबी, दुबई, रास अल खैमाह आणि शारजाह) ३० अतिरिक्त विमाने चालवेल. नल ८ मार्चपासून युरोपमधील प्रमुख ठिकाणांशी पुन्हा संपर्क जोडण्याचे नियोजन केले असून मध्य-पूर्वेतील ८ शहरांसाठी आपली विमान सेवा सुरू ठेवणार असल्याचे इंडिगो कंपनीने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. इंडिगोने जाहीर केले आहे की, त्यांनी युरोपसाठी आपली विमान सेवा पुन्हा सुरू केली असून अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील आठ शहरांमधून कामकाज सुरू आहे.
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीमुळे विमान सेवांच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर आपल्या विमानाची सद्यस्थिती (Flight Status) तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरही कंपनीकडून वेळोवेळी अपडेट्स दिले जातील. अधिक माहितीसाठी प्रवासी २४ तास उपलब्ध असलेल्या संपर्क केंद्राशी (Contact Centre) संपर्क साधू शकतात.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. २८ फेब्रुवारीपासून बहरीन, दुबई, कुवेत आणि कतार यांसारख्या प्रमुख केंद्रांवरील विमाने मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आखाती देशांमधील एमिरेट्स, एतिहाद आणि कतार एअरवेज सारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी मर्यादित प्रमाणात बचाव मोहिमेसाठी विमान सेवा पुन्हा सुरू केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA)म्हटलं आहे की, आखाती आणि पश्चिम आशियाई प्रदेशातील हवाई क्षेत्र बंद असतानाही, देशी आणि परदेशी विमान कंपन्यांनी ५०,००० हू अधिक भारतीयांना सुरक्षितपणे परत आणले आहे. १ ते ७ मार्च दरम्यान, मध्य-पूर्व देशांमध्ये ट्रान्झिटमध्ये असलेल्या किंवा अल्पकालीन भेटीवर गेलेल्या ५२,००० हून अधिक भारतीयांनी मायदेशी परतले आहेत. यापैकी ३२,१०७ प्रवाशांनी भारतीय विमान कंपन्यांद्वारे प्रवास केला.येत्या काही दिवसांत आणखी विमानांचे नियोजन असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर शनिवारी (दि. ७ मार्च) किमान १०० आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. मुंबई विमानतळावरील ३५ उड्डाणे आणि ३६ आगमने , तर दिल्ली विमानतळावरील २२ उड्डाणे आणि १७ आगमने रद्द करण्यात आल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एअर इंडियाची बहरीन, दम्माम, दोहा, कुवेत आणि रियाध येथून येणारी आणि जाणारी सर्व नियोजित विमाने १३ मार्चपर्यंत रद्द राहणार आहेत. ज्या प्रवाशांचे बुकिंग रद्द झाले आहे, ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय भविष्यातील तारखेसाठी पुन्हा बुकिंग करू शकतात किंवा पूर्ण परतावा (Refund) घेऊ शकतात, असेही विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.