Pakistani Brides Reach India Pudhari
आंतरराष्ट्रीय

Pakistani Brides: साखरपुडे झाले, पण लग्न रखडलं! अखेर 150 पाकिस्तानी वधू भारतात दाखल; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अडकला होता व्हिसा

Pakistani Brides Reach India: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर व्हिसा आणि सीमा निर्बंधांमुळे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सुमारे 150 महिलांचे भारतात होणारे विवाह रखडले होते.

Rahul Shelke

Pakistani Brides Reach India: भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक विवाह रखडले होते. मात्र, आता अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सुमारे 150 वधू भारतात पोहोचल्या आहेत. या महिलांचे भारतातील तरुणांशी साखरपुडे झाले होते, पण व्हिसा आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे त्यांचे विवाह अडकले होते.

यापूर्वी पाकिस्तानातील सिंधी कुटुंबांना वाघा-अटारी सीमेच्या मार्गाने भारतात येऊन मुलींचे विवाह करणे तुलनेने सोपे होते. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर परिस्थिती बदलली. सीमा मार्गावरील निर्बंध आणि व्हिसासंबंधीच्या अडचणींमुळे अनेक वधूंना भारतात येता आले नाही.

नागपूरमधील सिंधी समुदायासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश झांबिया यांनी सांगितले की, मोठ्या प्रतीक्षेनंतर या महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला. त्यामुळे रखडलेले अनेक विवाह आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

थेट पाकिस्तानातून नाही, अन्य देशांच्या मार्गाने भारतात प्रवेश

या वधू आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट जमीनमार्गाने भारतात येण्याची परवानगी नसल्याने त्यांनी दुबई, मस्कत, श्रीलंका, बांगलादेश आणि इतर देशांच्या मार्गाने विमान प्रवास करत भारत गाठला.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांचे विवाह नागपूर, रायपूर, जोधपूर, पुणे आणि देशातील इतर शहरांमध्ये ठरले होते. सुमारे 150 वधूंचे साखरपुडे आधीच झाले होते आणि त्या आपल्या लग्नासाठी भारतात येण्याची वाट पाहत होत्या.

धार्मिक संस्थेने घेतला पुढाकार

या प्रकरणात पाकिस्तानातील सिंध प्रांतातील शदाणी दरबार या धार्मिक संस्थेनेही महत्त्वाची भूमिका बजावली. भारतात विवाह ठरलेल्या महिलांची माहिती गोळा करून त्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर ही यादी संबंधित यंत्रणांकडे पाठवून या महिलांना भारतात येण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली.

यानंतर केंद्र सरकारकडून काही वधूंना आणि त्यांच्या नातेवाईकांना भारतात प्रवेशाची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांना हवाई मार्गानेच प्रवास करावा लागेल, अशी अट घालण्यात आली होती.

नागपुरमधील 15 विवाह

एप्रिलपासून आतापर्यंत पाकिस्तानातील सुमारे 150 वधू आणि त्यांचे नातेवाईक भारतात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नागपुरातील सुमारे 15 विवाहांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पाकिस्तानात अजूनही सुमारे 300 महिला भारतात येण्यासाठी व्हिसाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले जात आहे. या महिलांचेही भारतातील पुरुषांशी विवाह ठरले असून, त्यांना लवकरात लवकर व्हिसा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक महिन्यांपासून लग्नाची प्रतीक्षा करणाऱ्या या कुटुंबांसाठी 150 वधूंचा भारतातील प्रवेश हा मोठा दिलासा मानला जात आहे. आता उर्वरित महिलांनाही भारतात येण्याची परवानगी कधी मिळते, याकडे संबंधित कुटुंबांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT