पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Next Captain : टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली. भारत पुन्हा एकदा बाद फेरीतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहिले. दरम्यान, टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) चांगली कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले. त्याने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी (Team India) मोलाची कामगिरी केली. अगामी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, पंड्याबाबत एक मोठा अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये बीसीसीआय (BCCI) हार्दिकला जानेवारीपासून भारताचा पूर्णवेळ कर्णधार बनवत असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या 9 वर्षांपासून भारताने कोणतीही ICC स्पर्धा जिंकलेली नाही. त्याचबरोबर संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर संघात अनेक बदल होऊ शकतात. त्याच वेळी, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल (Hardik Pandya) एक मोठे अपडेट समोर येत आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये बीसीसीआय त्याच्याकडे कर्णधार पदाची मोठी जबाबदारी सोपवू शकते. बीसीसीआय जानेवारीपासून भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवेल असा अंदाज वर्तवला जात आहे. याचा अर्थ रोहित शर्मा लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. 2022 च्या टी 20 विश्वचषकात रोहित शर्माकडून (Rohit Sharma) सगळ्यांना खूप आशा होत्या. 15 वर्षानंतर तो टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण यात तो अपयशी ठरला. हिटमॅन टी-20 वर्ल्ड कपमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून एकही चांगली खेळी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे तो खूप ट्रोलही झाला होता. त्यामुळे BCCI कठोर निर्णय घेऊन रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवू शकते आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. (Hardik Pandya Next Captain)
हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) अलीकडेच आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये भारताने आयर्लंडचा 2-0 ने पराभव केला. याशिवाय त्याने आयपीएल 2022 मध्ये आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले. त्याने IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या नव्या संघाची कमान हाती घेतली आणि पहिल्याच सत्रात या संघाला IPL चा चॅम्पियन बनवले. त्याने 15 सामन्यात 44.27 च्या सरासरीने चार अर्धशतकांसह 487 धावा केल्या. यासोबतच आठ विकेट्सही घेतल्या. (Hardik Pandya Next Captain)
टी 20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याने चमकदार कामगिरी करून बरीच प्रशंसा मिळवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने आपल्या बॅटने दमदार खेळी केली. त्याने 33 चेंडूत 63 धावा फटकावल्या. त्यातत्याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हार्दिकला 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली आहे.