पणजी : पुढारी वृत्तसेवा
दाबोळी - वेर्णा उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे वाढलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वास्को वाहतूक कक्षाला मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सामना करावा लागत आहे. अधिकृत मंजूर ७५ पदांपैकी केवळ ४३ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३२ पदे (४३ टक्के) रिक्त आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, सर्वाधिक तुटवडा पोलिस काँस्टेबलचा आहे. मंजूर ४० पदांपैकी केवळ १७ काँस्टेबल कार्यरत असून २३ पदे रिक्त आहेत. तसेच सहा पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांपैकी फक्त तिघेजण कार्यरत आहेत. सात सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) पदांपैकी चार, तर २० पोलिस हवालदारांपैकी १७ कर्मचारी उपलब्ध आहेत. पोलिस निरीक्षकाचे पद मात्र भरलेले आहे.
वास्को वाहतूक शाखेच्या अखत्यारीत संपूर्ण मुरगाव तालुक्यातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी आहे. यात वास्को शहर, दाबोळी, चिखली, सांकवाळ, कुठ्ठाळी, वेल्साव, मुरगाव बंदर परिसर, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे रस्ते, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, औद्योगिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी केंद्रांचा समावेश आहे.
सध्या दाबोळी - वेर्णा उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रस्ते अरुंद झाल्यामुळे कार्यालयीन वेळेत, विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांमुळे, औद्योगिक कामगार, शालेय बस आणि जड वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत आहे.
विशाल मेगा मार्ट, वालेस जंक्शन आणि एमईएस महाविद्यालय परिसरातील चौक हे बांधकामामुळे प्रमुख वाहतूक कोंडीचे ठिकाण बनले आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, उपलब्ध कर्मचाऱ्यांनाच वाहतूक नियंत्रण, अपघातस्थळी मदत, व्हीआयपी बंदोबस्त, शाळा परिसरातील वाहतूक, सण-उत्सवांतील बंदोबस्त आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.
त्यामुळे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कर्मचारी हलवावे लागत असल्याने काही महत्त्वाचे चौक तात्पुरते मनुष्यबळाविना राहतात. एआय-आधारित कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहतूक नियमभंगावर नजर ठेवणे शक्य असले, तरी गर्दीच्या चौकांमध्ये प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ अपरिहार्य आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.