पणजी : पुढारी वृत्तसेवा
वाघिणीसह दोन बछडे आढळलेल्या तिळारी खोऱ्यातील संवर्धन राखीव क्षेत्रात खासगी बांधकाम प्रकल्प येत आहेत. त्यामुळे नैसर्गिक व्याघ्र प्रजनन आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, अशी भीती वन्यजीवप्रेमींनी केली आहे.
या परिसरात काहींनी फार्महाऊस व अन्य बांधकामांसाठी भूखंड तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. हे प्रकल्प सह्याद्रीतील एकमेव व्याघ्र प्रजननाचे नैसर्गिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिळारी संवर्धन राखीव क्षेत्रात येत असल्याने या भागातील जंगले नाहीशी होऊन सिमेंटची जंगले उभी राहण्याची भीती पर्यावरण प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
या नियोजित प्रकल्पाच्या परिसरातच सिंधुदुर्ग वनविभागाला नुकतेच व्याघ्र प्रजननाचे पुरावे मिळाले आहेत. साहजिकच या प्रकल्पांमुळे आपसुकच व्याघ्र प्रजनन आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे. तिळारी संवर्धन राखीव क्षेत्र हे वाघांचे नैसर्गिक प्रजनन क्षेत्र आहे. याठिकाणी अनेकदा व्याघ्र अधिवासाचे आणि व्याघ्र प्रजननाचे पुरावे सापडले आहेत.
तिलारी संवर्धन राखीवमधील पाट्ये, शिरंगे, केंद्रे हे सर्व गोवा व महाराष्ट्राच्या संयुक्त धरण प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील हा भाग व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्याठिकाणीच तिलारी इस्टेट सारखे खासगी बांधकाम प्रकल्प प्रस्तावित झाल्याने वाघांच्या नैसर्गिक प्रजनन केंद्रावर गदा येण्याची भीती आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्लूआयआय) सावंतवाडी-दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह झोन संदर्भातील अहवालात देखील पाट्ये परिसरात वाघिणीचा अधिवास असल्याचे म्हटले आहे.
वाघांच्या बळीची भीती
वाघांचे अस्तित्व त्या भागात असल्याचे कायदेशीररित्या सिद्ध झाले आहे. हा पुरावा नव्या बांधकाम प्रकल्पांना अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे स्थानिक एजंट आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे मिळून या वाघांची शिकार करून आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्याची भीती ठळक बनली आहे.