एसआयआरकडे पाठ
एकूण मतदारसंख्या कमी होणार
मुंबईकर मतदारांवरील निवडणुकीतील खर्चाला आळा बसणार
गावाशी राहिलेले बंध ढिले होतील
सिंधुदुर्ग : गणेश जेठे
तळकोकणातील विधानसभेची निवडणूक असो की जिल्हा परिषदेची असो की ग्रामपंचायतीची असो, विजयाची रणनीती आखताना मुंबईकर मतदारांची यादी प्रथम मांडली जाते. त्यांना काहीही करून मुंबईवरून गावात मतदानाच्या दिवशी आणायलाच हवे. गरज पडली तर गाड्यांचे रिझर्व्हेशन करून देण्यापासून वरखर्च पुरविण्यापर्यंतची सगळी जोडणी आरंभली जाते.
आता निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या 'एसआयआर' कडे मात्र चाकरमान्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते आहे, ज्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील मतदारयाद्यांमधून चाकरमान्यांची नावे घटणार हे जवळपास निश्चित आहे.
विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण मोहीम म्हणजेच एसआयआर सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. बीएलओ घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत. तळकोकणात सध्या ३० टक्के घरे बंद आहेत. उन्हाळी सुट्टी संपवून मुंबईकडे रोजीरोटीसाठी परतलेला चाकरमानी 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत गणेशोत्सवाला पुन्हा गावी गर्दी करेल.
बंद घरे पटापट उघडतील. परंतु जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये पावसाळ्यात तो गावाकडे फिरकत नाही. नेमक्या याच काळात आता ही 'एसआयआर' मोहीम सुरू झाली आहे. सध्या बीएलओ मतदारयादीतील नावांनुसार बंद घरांच्या दरवाजांवर दस्तक देत आहेत. अर्थात त्या घरात एकही व्यक्ती नसेल तर दार उघडत नाही आणि फॉर्म स्वीकारलाही जात नाही.
अशी मुकी बंद घरे गावोगावी आहेत. २१ जुलैपर्यंत हे चाकरमानी आले नाहीत, तर प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर त्यांना अपिलाची संधी आहे. परंतु, ही प्रक्रिया आणखी वेळखाऊ आहे. म्हणूनच प्रशासनाला सध्या चाकरमान्यांची प्रतीक्षा आहे.
चाकरमान्यांची मतेही निर्णायक
मात्र मुंबईकर चाकरमानी याबाबतीत उदासीन दिसतो आहे. तो अपेक्षित प्रमाणात गावाकडे येताना दिसत नाही. बंद घरे उघडत नाहीत. खरेतर तळकोकणात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावचा सरपंच मुंबईकर चाकरमानी निवडतात, अशी स्थिती आहे. अनेक गावांमधील ३० टक्के मतदार मुंबईतच राहतात. याच मतदारांना आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते.
मतदार आणि राजकीय कार्यकर्तेही उदासीन
आता मात्र मुंबईकर चाकरमान्यांची मते नसली तरी काय हरकत आहे, असा विचारही सुरू आहे. त्यांच्यावर मोठा खर्च करावा लागतो. त्यात पुन्हा दोन्ही बाजूच्या उमेदवारांकडून खर्च झाला तर ते मतदान आपल्यालाच मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही चाकरमान्यांचे नाव मतदारयादीत कायम राहावे म्हणून फारसे उत्सुक दिसत नाहीत.
गावातील राजकीय वादात पडण्यापेक्षा आपले गावाकडच्या मतदारयादीत नाव नसलेले बरे असा विचारही अनेक चाकरमानी करत आहेत. असे चाकरमानी गावच्या एसआयआरकडे पाठ फिरवण्याच्या मनस्थितीत आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तळकोकणातील मतदारांची संख्याच घटण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईकर चाकरमानी मुंबईत असला, तरी त्याचे नाव जेव्हा गावाकडच्या मतदारयादीत असते तेव्हा गावाकडचे राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क राहतो. परिणामी, गावातील राजकीय घडामोडींकडे चाकरमान्याचे लक्ष राहते. गावच्या वाटवाल्याशी चाकरमान्याचे बंध घट्ट जुळलेले असतात. मतदारयादीतील नाव उडाले तर मात्र हे बंध कमजोर होत जातील, अशी स्थिती आहे.