साळ : पुढारी वृत्तसेवा
साळ पंचायत क्षेत्रासह पंचक्रोशीतील वीज ग्राहक गेल्या काही महिन्यांपासून भरमसाट वीजबिलांमुळे त्रस्त झाले आहेत. वीज खात्याकडून कोणतीही स्पष्ट माहिती किंवा समाधानकारक कारण न देता ग्राहकांना वाढीव बिले पाठविली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वीज ग्राहक आपल्या वापरानुसार मीटरद्वारे नोंद झालेल्या युनिट्सचे बिल नियमितपणे भरत असतात. अतिरिक्त वीज वापर झाल्यास त्यानुसार वाढीव रक्कम आकारणे स्वाभाविक असले, तरी वीज खात्याकडून 'पेनल्टी'च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
खात्याच्या त्रुटींचा भार ग्राहकांवर टाकला जात असून, त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. महागाई आणि विविध आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी हा आणखी एक त्रासदायक प्रकार ठरत आहे. ग्राहकांच्या मते, वीज खात्याने नागरिकांच्या घरी जाऊन किंवा योग्य माध्यमातून वाढीव बिलांचे कारण स्पष्ट करणे आवश्यक आहे.
मात्र तसे न करता थेट भरमसाठ बिले आकारून ग्राहकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी ज्या कुटुंबांना सुमारे ३०० रुपये वीजबिल येत होते, त्यांनाच आता एक हजार ते बाराशे रुपयांहून अधिक रकमेची बिले देण्यात आली आहेत.
वीज वापरात विशेष वाढ नसताना बिलांमध्ये झालेली ही वाढ नागरिकांच्या आकलनापलीकडची असल्याचे ते सांगतात. तसेच, ज्या ग्राहकांना दरमहा दोन ते अडीच हजार रुपयांचे बिल येत होते, त्यांना यावेळी 'पेनल्टी'च्या नावाखाली साडेपाच हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची बिले दिली। आहेत. ही आकारणी नेमक्या कोणत्या नियमांनुसार केली जात आहे, याबाबत ग्राहक संभ्रमात आहे.