पणजी : राजधानीत गुरुवारी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २८ अंश सेल्सिअस होते. मागील २४ तासांत कमाल तापमान ३६.२, तर किमान तापमान २८.५ अंश सेल्सिअस होते.
पणजीत राजस्थानच्या काही सर्वात उष्ण वाळवंटी शहरांपेक्षाही जास्त 'प्रत्यक्ष जाणवणारे' तापमान वाटत होते. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) राष्ट्रीय पोर्ट-लनुसार, आर्द्रतेमुळे पणजीमध्ये 'प्रत्यक्ष जाणवणारे' तापमान ५२.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. भारतीय हवामान विभागाने कमाल तापमान ३५-३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७-२८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
आयएमडीचे संचालक नहुष कुलकर्णी यांच्या मते, नोंदवलेले तापमान आणि जाणवणारे तापमान यात फरक असतो. जाणवणारे तापमान हे सापेक्ष, आर्द्रतेसारख्या घटकांमुळे प्रभावित होते. आर्द्रतेत थोडी वाढ आणखी काही दिवस तापमान ३५ अंश राहण्याची शक्यता झाली, तरी जाणवणारी उष्णता वाढू शकते. 'दिवसाची तीव्र उष्णता, रात्रीचे वाढलेले तापमान आणि वाढलेली आर्द्रता यांच्या एकत्रित परिणामामुळे ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दुपारी आणि रात्री अधिक तापमान जाणवते.
येत्या काही दिवसांत हवामान असेच राहण्याची शक्यता असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. लहान मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. शरीरातील पाण्याची कमतरता (डिहाय-ड्रेशन) वाढण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे. तसेच दिवसातील सर्वाधिक उष्ण वेळेत, म्हणजेच दुपारी ११ ते ३ या वेळेत बाहेर जाताना उष्णतेपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचा सल्लाही दिला आहे.